Saturday, October 10, 2015

गंध मातीचा

खूप दिवसांनंतर ब्लॉग वर काहीतरी लिहायला वेळ मिळाला (काढलाच म्हणा) .... अचानक आलेल्या शिथिलतेचा इथेच खंड करून नवीन उर्जेने पुनरुज्जीवन करण्याचा आमचा मानस आहे.

ही कविता आपली माती, आपली नाती, आपली माणसं या सर्वांना अर्पण. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्फूर्तीला सलाम. काळाच्या ओघात पुढे जात असताना काही मुलभूत प्रश्न मांडण्याचा आणि त्याद्वारे माणुसकीच काय होईल  याचा आपण सर्वांनीच विचार करणे क्रमप्राप्त आहे.

  
स्पंदनांची बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

हृदयाला धडधडण
याच्या पलीकडंही
खूप काही ठाऊक असतं
जाणीवेचा प्रतिबिंब
असतं हृदय ... हे आता
समजावेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

बीजाला पेरण
खतपाणी देणं
फुटलेल्या अंकुरची
जीवापाड काळजी घेणं
या जगात हे सारं
शिकवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

सारंकाही ठीकठाक
म्हणता म्हणता
अचानक्तेचा गौप्यस्फोट
होता होता
सावध राहण्याची गरज
सांगेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

जगणं दुसऱ्यांसाठीच
बाळकडू देणारं
"स्व”तःच्या खिडकीपलिकडच
नयनरम्य दृश्य पाहण्याचं
प्रवाह विचारांच्या अशा
टिकवेल का कोणी...
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

जन्माचं कारण
शून्याचा उगम
अस्ताच प्रारब्ध
उलगडणारी रहस्य
आता उलगडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

सजीव असण्यामागच
प्रेम करण्यामागच
मायेच्या ओलाव्याने
जवळ घेण्याचं
गणित सोडवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

स्पंदनांची बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा

जपेल का कोणी ?


           विश्वजीत




Sunday, October 4, 2015

"गर्दी"श में तारे

                                                                    "गर्दी"श में तारे
कधी कधी प्रश्न पडतो - गर्दी बरी का एकांत?! गर्दी, गोंधळ, गडबड असतच आजूबाजूला. ती असल्याशिवाय काम पुढे जात नाही आणि हल्ली तर वेळही नाही! ते म्हणतात नं कुठलीही गोष्ट, व्यक्ती, वस्तू नसली तरचं त्याची किंमत जाणवते, ते अगदी खरं आहे. शांततेच्या गावी गर्दीचे सूर गवसतात आणि गर्दीत असताना स्तब्धतेची आठवण होते. आज अचानक आजूबाजूला स्मशान शांतता जाणवतेय !
आणि अचानक ध्यानी येतं की नकळत सवय लागली आहे आपल्याला गर्दीची, गर्दीतल्या माणसांची आणि माणसांच्याही गर्दीची. गणपती आले आणि गेले, काल पाऊसही येउन गेला.. त्यामुळे परत कोरड पडली आहे. ओलावाही नाही आणि भावनाही ...मग कुठूनतरी धाडकन आवाज येतो कसलातरी...तात्पुरता नकोसा वाटतो पण मौन धारण केल्यावर आपणही गप्प बसतो!!!
मध्यरात्री किव्हा भर पहाटे गडबड जास्त नसल्याची जाणवते आणि अचानक खूप काही गोष्टी डोळ्यासमोर आणि मनात तरंगू लागतात...  मनाने वाट मोकळी करून द्यायची ठरवली तर किती मार्ग असतात नं !
 आपल्यला आवडत असो वा नसो, पण गर्दी खूप काही शिकवते माणसाला! स्टेशनला ब्रिजवर गर्दीत मधेच उभी किंव्हा खाली बसलेली म्हातारी, तिचे पाणावलेले डोळे, पसरलेले हात, केवीलवाणी नजर, सुरकुत्या पडलेलं कृष, अशक्त शरीर.... कसं जगायचं, कसं चालायचं, कसं वागायचं, कसं झेलायचं, कसं  बोलायचं हे शिकवतो  गजबजाट... समाजाला जिवंतपणा देण्याचा काम गर्दी देते. आवाजाने घेरलेल्या "आपल्याला" आयुष्यभर प्रत्येक क्षणी ती असावी आसपास असावी असं वाटतं. ह्या कोलाहलात सकाळ कधी होते कळतच नाही.. मधल्या काळात गर्दीची आठवण आणि आठवणींची गर्दी येउन झालेली असते...मग शांत असलेल्या वातावरणरुपी कॅन्वासात आवाजाचे रंग भरायला सुरुवात होते ….   जसं आपल्या मोकळ्या, काळ्या आकाशात आपल्या कल्पकतेच चांदणं चमकतं !!! :)

                                                                   - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - गुगल इमगेस pixcooler.com )

Tuesday, June 2, 2015

ती सावली

                                                                       
                                                                        ती सावली
नित्यनियमाने दर महिन्याच्या एखाद्या रविवारी रद्दी काढण्यास बसावा तशी मी बसले आणि खूप जास्त पेपर्स जमा झालेले, त्यातले लोकरंग आणि चतुरंग बाजूला काढले आणि सहजच वाचायला बसले. वाचता वाचता डॉक्टर संजय ओंक ह्यांच्या लोकरंग मधील 'जगात मनात' कॉलम वाचला आणि थक्कच झाले.. लेखाचा शीर्षक होतं दोन सावल्या आणि सुरुवातीला सरांनी लिहिलेलं की
एक सावली माणसाला पूर्णत्व देणारी , एक सावली त्याला अजिबात नको असणारी, एक सावली सुखद असत्य तर दुसरी दुखद सत्य .. एक सावली जीवन दुसरी मृत्यू ...
खरंच ह्या ओळी वाचल्यावर मनात एक प्रश्न उद्भवला की जगतो का आपण पूर्णपणे ?!  To the fullest?! आयुष्याच्या कठीण वळणावर कळतं की काहीतरी करायचा राहून गेलं, कुणालातरी काहीतरी सांगायचा राहून गेलं, कुणाकडून काहीतरी ऐकायचं राहून गेलं, घेत घेत कितीतरी द्यायचा राहून गेलं...खरंतर जगायचंच राहून गेलं!!
                      जगता जगता आपण किती खोटं बोलतो नं... मुखवटे घालून आयुष्य पुढे सरसावतो.. ह्या खोटेपणामुळे आपणच धडपडतो,  आपल्याच मनात कुजतो, नाती-गोती जपायला सुरुवात होते.. मनातल्या मनात आपण खोटे असून जगाला आपण खरे असल्याचा मुखवटा घालून समाजात वावरतो. कोणे एके काळी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती म्हणणारे आपण भीत भीत जगतो. मग मनात विचार येतात जे आपल्यलाला भूतकाळात बांधून ठेवतात आणि भविष्यातही घेऊन जातात पण ह्या नादात वर्तमानाला न्यायच मिळत नाही. जगणं किती सुंदर असू शकतं ते आपल्याला दुसऱ्यांच आयुष्य वाचल्यावर, ऐकल्यावर, पाहिल्यावर कळतं. स्वतः स्वताचे मार्गदर्शक व्हायचं ते दूरच राहिलं! निर्जीव वस्तूत सुद्धा आत्मा असतो पण आपला आत्मा निर्जीव झालेला असतो...
                            आणि अशा एका कठीण वेळी ती सावली समोर येते जी प्रत्येकच आयुष्यात वेगवेगळ्या निमित्ताने संधी साधून येते,जिचा आपल्या सर्वांना राग, तिरस्कार वाटतो ... मृत्यू... ती तिचं काम करत असते, आपल्या कामातून आपल्याला घेऊन जाते... death ...सून्न करणारी.. मृत्यूची चाहूल लागल्यावर आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होते अचानक .. मग पुन्हा नाती जोडावीशी वाटतात... संपूर्ण आयुष्य एकट्याने चाललेलो असतो आपण, आत्ता कोणीतरी हवं असतं आपल्याला.. मग लक्षात येतं की तेव्हा सगळ्यांना घेऊन चालायला हवं होतं... सर्वांच्या चुका काढणारे आपण, आपल्या बाबतीत घडता तेव्हा बोट वळवतो .. ही सावली आपल्याला कवेत घेण्यास सज्ज असते.. आपण मात्र पुन्हा जगण्याच्या संधीच्या शोधात असतो ....
             
                                                              - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - लाइट वर्डस) 

Wednesday, May 27, 2015

NOSTALGIA ...

बा … प … रे … अडीच महिन्यांपूर्वी जेव्हा ब्लॉगवर लिहायला सुरवात केलेली तेव्हा खरं म्हणजे डोक्यात चित्र clear होतं की आपल्याला काही रोजच; किंवा रोज कशाला, नियमित सुद्धा लिहायला नाहीच जमणार बहुदा ! अभियांत्रिकी करताना, आणि तेही शेवटच्या वर्षी, असले छंद जोपासायचे म्हणजे एकाच वेळी दोन नावांवर पाय ठेवण्यासारखं आहे … आणि नाही, ही काही अतिशयोक्ती नाही … पण जिथे कित्येकदा जेवायला सवड मिळायची नाही तिथे लिहिण्या-बिहीण्याचे चोचले कसे हो घ्यायचे पुरवून !!! तर सांगायचा मुद्दा असा की लिहिण्यात खंड पडणार हे गृहीत धरलेलंच होतं, पण तो खंड अक्षरशः आशिया खंडाएवढा मोठ्ठा असेल असा विचार नव्हता केला कधी. परीक्षा, assignments, परीक्षा, project, viva … साखळीच लागली जणू … आणि आता आज वेळ मिळतोय … ना, किंबहुना योग जुळतोय पुन्हा लिहिण्याचा …

असो … परीक्षा संपून, घरी परत येउन आता आठवडा लोटलाय जवळपास. काय वाटतंय नक्की सांगता नाही येणार … डिग्रीची चार वर्ष संपली, rather संपली सुद्धा ? असं वाटतं परवाच तर मी सामान बांधून मुंबईला निघाले होते engineer व्हायला … ICT मध्ये प्रवेश मिळाला, हॉस्टेल मिळायला सुद्धा फारशी अडचण आली नाही … सुरवातीला अवघड वाटत होतं सगळंच … पण मग कॉलेज, हॉस्टेल, मुंबई सगळ्याचीच सवय झाली हळूहळू. चार वर्षांत डोंगराएवढं शिकायला मिळालं आणि असंख्य माणसं जोडली गेली … अशा अगणिक आठवणी मनःपटलावर कोरल्या गेल्या ज्या या जन्मात तरी विसरणं निव्वळ अशक्य आहे. कॉलेजचे मोहोत्सव … पहिल्या वर्षी जवळ-जवळ सगळ्याच कार्यक्रमात केलेली गाढवासारखी मेहनत … प्रत्येक परीक्षेच्या बरोबर आदल्या दिवशी हॉस्टेलवर घातलेला धुमाकूळ आणि मग अर्थातच जागवाव्या लागलेल्या रात्री … प्रयोगशाळेत केलेली मज्जा … दिवाळीच्या सुट्टीत काढलेल्या सहली … मराठीचा वारसा जपणाऱ्या आमच्या 'मंथन' या सांस्कृतिक मंडळाचे कार्यक्रम … त्या ओघातच सादर केलेली नाटकं, गाणी … सणावाराला हॉस्टेल मध्ये रंगलेल्या त्या 'dj nights' … शेवटचं वर्ष म्हणून हॉस्टेल मधल्या मुलांबरोबर केलेला आणि अजिबातच न जमलेला तो नाच … आणि मग हळू हळू जवळ आलेला शेवट … सगळ्यांबरोबर केलेलं शेवटचं lecture, शेवटची परीक्षा, शेवटची पार्टी, शेवटचा सिनेमा, शेवटचं जेवण, हॉस्टेल मधला शेवटचा दिवस … निरोप-समारंभ … निघताना डोळ्यात उभं राहिलेलं पाणी … भेटण्या-बोलण्याची दिलेली वचनं … आणि काहीतरी मागे राहून गेल्यासारखी अखंड वाटणारी हुरहूर … 

साधारण दिवेलागणीच्या वेळेस मी एकटीच खिडकीशी बसलेली असते. अचानक वाऱ्याची एक मंद झुळूक हृदय स्पर्शून जाते. आणि या सगळ्या आठवणी एका पाठोपाठ एक मनावर कोसळू लागतात … कुठेशा वाचलेल्या ओळी आठवतात … 


मनाच्या गाभाऱ्यात 
आठवणी दाटतात 
पापण्यात साठतात 
स्मृतीची गवतफुले 
दुरूनच वेडावतात 
हर्षाचे दवबिंदू 
मोत्यापरी चमकतात 
ओंजळीत घेताना 
क्षणभरात निसटतात … 

आठवणींचे हे दवबिंदू माझ्या ओंजळीतून कधीच निसटू नयेत असं वाटत राहतं. हे मोती शब्दांच्या शिंपल्यात कायमचे जपण्यासाठी मन धडपडू लागतं. हात नकळत लेखणीकडे वळतात आणि कागदावर अविरत होत राहते, आठवणींची पानगळ ……

-निकिता 
   

Tuesday, April 21, 2015

एकांत आणि बरंच काही…

Solace                एकांत आणि बरंच काही…
                             बैठ्या चाळीत असल्या कारणाने विरंगुळ्यासाठी, मोकळं, शांत वाटून घ्यायचा असलं की कट्ट्यावर किव्हा घराच्या उंबरठ्यावर बसून आठवणीच्या ढगावर नेम धरते मी. आणि काहीही आठवतं, अक्षरशः काहीही ! एखादं गाणं, एखादी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीचा सहवास, एखादी वस्तू ... काहीही कसाही. आपण एकट असलो की निवांतपणे आठवणींना उजाळा देऊ शकतो कोणीतरी शेजारी असलं की आठवणींचा झूला दोघांच्या पेसनुसार झुलवावा लागतो... Soltitude is the best soulmate एकांताशी एकरूप होऊन कधीकधी आपण रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळा करतो…  प्रोडकटीव एकांत असतो. आठवणींना बहर येतो.. कुठच्या कुठे विचार पोहोचतो...माग अशा वेळी मला "सेलीब्रेशन" नाटकातील वंदना गुप्तेंचा संवाद आठवते जे त्या आपल्या मुलांना सांगतात ,"आठवणींच जंगल खूप विशाल असतं...एकटे गेलात तर हरवून जाल.. सोबत गेलात तर आनंद द्विगुणित होईल"                                                                
                हा सर्व कल्लोळ मनात सुरु असताना अनपेक्षित पाऊस कोसळतो.. न सांगून येणाऱ्या पाहुण्यासारखा .. आणि आठवणींना एक वेगळीच दिशा मिळते, एक वेगळाच angle मिळतो... खड्ड्याच्या रस्त्यावर चाललेली गाडी जेव्हा सरळ, स्मूथ रस्त्यावर आल्यावर जो आनंद होतो न अगदी तशी भावना पावसाच्या आगमनाने मनात येते. असं म्हणतात आवाज मनाला विचलित करतात, शांतता भंग करतात ... पण पावसाच्या आवाजात जादू असते.. सर्व काही जुळवून आणण्याची.. मनाला शांत करण्याची.. मग हळूच आपण रिमझिम गिरे सावन ऐकतो, तर कोणी चिम्ब भिजलेले गातं, तर कधी वारा गायी गाणे म्हणत भिजून गेलेल्या वार्याला अनुभवत.. रणरणत्या उन्हात तुमच्यावर थोडासा शब्दमयी पाण्याचा शिडकावा केला :p  थोड्या वेळाने पाऊस थांबतो पण मी मात्र पावसाच्याच आठवणीत अजूनही भिजलेली असते...त्याच्यातच गुंतलेली.. आयुष्यातही अशी माणसं असतात ज्यांच्या आपल्यासोबतचा प्रवास तसं पाहायला गेलं तर थोड्याच दिवसांचा अथवा वेळेचा असतो.. ती येतात पावसासारखी.. त्यांच्या जाण्याचा नेम नसतो... असला तरी surprise देतात कधी कधी.. असली तरी कायम नसतात... नदीसारखी असतात ...मनाला स्पर्शून पुढे जाणारी :)
                                                                   - अपूर्वा     
छायाचित्र सौजन्य -नओमी सिल्वर आर्ट्स (गुगल इमागेस )

Saturday, April 18, 2015

शब्द

            शब्दांविषयी बोलावं तेवढं कमीच आहे !! कोणत्याही लिपीचा मूळ घटक आहे शब्द .... शब्दांनी किमया करावी असा कित्येकांना वाटतं .... प्रत्येकाला जमतच असं नाही .... पण ज्यांनी किमया साधली आहे त्यांचे शब्दही आपलं आयुष्य चांगलंच समृद्ध करू शकतात ...... अशा गूढ शब्दांबद्दल .......


बोलण्याचा मोह आहे
शब्दांचा मोठा डोह आहे
मार डुबकी त्या डोहात
ज्यात अगणित कांतीचे ओज आहे......

लिहिण्याची तलफ आहे
शब्दांचा तालमय डफ आहे
मार थाप त्या चामड्यावर
ज्यात शाहिराचा अजरामर पोवाडा आहे .....

वाचण्याची गरज नितांत आहे
शब्दांमध्ये ताकद अनंत आहे
घे अनुभव त्या ताकदीचा
ज्यात चिरंतन साहित्य सामावलं आहे....

पाहण्याचा मानस आहे
शब्दमय धुकं पांघरलेली दुनिया आहे
फिर ... पहा .... घे अनुभव त्या धुक्याचा
ज्यात गुलाबी थंडी अन गारवा आहे.....

जगण्याची इच्छा आहे
शब्दांचं तर जगणंच अमर आहे
कर स्पर्श त्या अमरत्वाच्या सुवर्णपटाला
ज्यात आयुष्य समृद्ध करणारा परिस आहे .....


                                           - विश्वजीत




Friday, April 10, 2015

शोध

                                           खूप काही चाललेलं असतं .... खूप काही घडत असतं .... या चराचरात.... डोळे उघडे ठेऊन जर बघितलं तर खूप काही दिसतं.... बऱ्याच गोष्टी ... काही गूढ, काही अनाकलनीय तर काही बुद्धीच्या पलीकडे ...... पण एक जाणवलेलं सत्य असं की काही बघण्याचा, त्यातून काही चांगलं शोधण्याचा दृष्टीकोन एकदम बोथट झालाय .... प्रत्येक गोष्ट डोळसपणे बघून त्यातल्या चांगल्या गोष्टी टिपून घेणं आवश्यक आहे ......


बघ, शोध या डोळ्यात
एखादा क्रांतीचा विस्तव
अंधाधुंद फसवाफसवीच्या जगात
प्रामाणिकतेची ज्योत पेटवायला

बघ, शोध एक माणूस
माणुसकी हरवलेल्या समाजात
नवविचारांची मुहूर्तमेढ रोवायला
बुरसटलेल्या रूढी परंपरा विसरून जायला

बघ, शोध एक शब्द
धूळ खात पडलेल्या पुस्तकांत
भावना हरपलेल्या लोकांमध्ये
भावनेचे अमृत ओतायला

बघ, शोध एक कुंचला
शतकोशतकांच्या चित्रांत
रंग विसरलेल्या आयुष्यांत
नव्याने रंगांची उधळण करायला

बघ, शोध एक विचार
शुद्ध आचारांची जोड असलेला
यांत्रिकतेच्या सापळ्यात सापडलेल्यांच्या
गुदमरलेल्या हृदयाचे कुलूप तोडायला

बघ, शोध एक स्वप्न-अपेक्षांचा गरुजराज
उंचच उंच भरारी घेणारा
उडणे विसरलेल्या पंखांमध्ये
स्वछंदाचे बळ भरायला ....

                                             
                                                - विश्वजीत



Friday, April 3, 2015

ट्रेन निघाली

                                                                           ट्रेन निघाली
               रोज गोरेगाव ते दादर अशा सध्या ट्रेनच्या प्रवासात नवलाई वाटते ती आमच्या लेडीज डब्ब्यात नेहमी होत राहणाऱ्या कधीही थांबणाऱ्या गप्पांची... गाडी भरत जाते तशाच गप्पा ही रंगतात आणि इतक्या रंगतात कि स्टेशन आलं तरी बाय म्हणवत नाही आणि ब्रिज वर चढताना ही त्या गप्पा सुरूच असतात...
            ट्रेन येण्याआधी गप्पा, ट्रेनमध्ये चढल्यावर गप्पा, उतरतानाही बडबड आणि कधी कधी उतरल्यावरही बडबड सुरूच असते.. कोण सुखाची बातमी देत तर कोण दुःखाची वार्ता... गप्पांचा स्वर-ताल काळानुसार, वयानुसार वरखाली होतो पण ओघ मात्र तोच राहतो... म्हणजे बघा दोन विवाहित बायका आपल्या सासूबद्दल ज्या तन्मयतेने बोलतात तितक्याच आत्मीयतेने दोन वृद्ध महिला आपल्या सुनांबद्दल एकमेकांना  सांगतात.. तर दोन मैत्रीणीचं गोस्सीप सुरु असतं किव्हा फोनवरील गप्पा सुरु असतात … तर काही गप्प असून दुसर्यांच्या गप्पांचा कानोसा घेतात आणि निमित्त मात्र candycrush  असतं.
                           ही गप्पांची उस्फूर्त लोकल पुढे सरसावते तसा बोलण्याला वेग येतो. कधी कधी सुरेल मैफिलही जमते. गाडीचा वेग वाढतो तसा गप्पांचा वेग वाढतो आणि ट्रेनचा वेग मंदावला किव्हा मधेच थांबली जरी तरी बोलण्याला थांब नसतो...म्हणजे भौतिक शास्त्राच्या सिद्धान्तासारखा “intensity of talk remains same irrespective of the speed of the train” :p  
             ही गप्पांची विरंगुळ्याची लोकल पुढे धावते ...गप्पा, बडबड, कटकट काहीही म्हणा बोलण्याने ती लोकल कशी जिवंत वाटते. नवीन नाती जोडली जातात, मग एक ग्रुप ही बनतो आणि हळू हळू ह्याची सवय होऊन ही  माणसा आपल्या जवळची होऊन बसतात. आपल्यातल्या काही लोकांना ही बडबड, ह्या गोष्टींची  कटकट वाटत असेल पण कुणास ठाऊक त्यांना त्याचं बोलण शेअर करण्यास कोण नसेल ही ! असूनही नसेल ! मग जाणवतं की लोकल सोबतही बोलण चालू असावा...forever ..stay connected  :)
                                                                    - अपूर्वा   


Friday, March 27, 2015

अपेक्षांचं सिंहासन



                     असं घडतं बऱ्याचदा...की एखादं मुल ... घरची परिस्थिती एकदम बेताची असताना .... विशेष असं काही जमत नसताना .... फक्त आणि फक्त डोळ्यातली स्वप्नं, काही करण्याची जिगर, काहीतरी करून दाखवण्याची कमालीची भूक .... यांना सोबतीला घेऊन घराबाहेर पडतं... कदाचित काम करण्याचं वयही नसतं तसं त्याचं ....घरामध्ये असणाऱ्या त्याच्या आईबापाने आयुष्यभर मर मर कष्ट उपसलेले असतात .... आता त्यांना अपेक्षा असते की आपल्या मुलाने काहीतरी करावं ... या अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन तो बाहेर पडतो .... खेळण्या-बागडण्याच्या वयात, हसण्या-खिदळण्याच्या वयात त्याला काम करावं लागतं ... आपल्याला सगळ्यात छान वाटणारं बालपण कदाचित त्याच्या वाट्यालाच नाही येत .....!!!




बाळा बाळा करत येईल आई
मऊ भात भरवायला, अंगाई गायला
परी तो नसेल घरट्यात
तो आहेच असं समजून देईल त्याला खायला ...

निमिषातच होतील डोळे टचकन ओले
क्षितीज देऊ लागेल आर्त साद ...
कसा असेल , काय करत असेल तो ?
काळजीने होतील कापरे तिचे मायाळू हात

पंखात बळ एकवटून
भरारी घेतली असेल बाळानं
'जिद्द' विजय मिळवते न्युनगंडावर
हे शिकवलं असेल काळानं

"जपून राहा रे ...
स्पर्धा आहे बाहेर खूप",
थकलेल्या बापाचे उपदेशाचे बोल आठवत
पाहत असेल जवळून त्या स्पर्धेचं रूप ...

पावसाच्या सरी अंगावर झेलत
घोंघावणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करत
लढत असेल तो करारानं
ठोकर खात का होईना ... असेल जगत...

प्रकाशाच्या दिशेने जाताना
खेचतील त्याचे पाय काळोखाचे दानव
पण तो नाही खचणार ... तो लढेल ...
जागा करेल त्या दानवातला मानव .....

जगेल तो तग धरून ...
प्रतिकुलतेतली अनुकुलता वेळीच ओळखून ....
अन परतेल त्याच्या घरट्याकडे
अपेक्षांच्या सिंहासनावर विजय मिळवून ....

असं घडतं ..... बऱ्याचदा ...... !!!


                                                                                      - विश्वजीत




Thursday, March 26, 2015

असेचं काही ….

                                                                      असेचं काही ….
      बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुलं ही देवाघरची फुलं असं वाटतंय न ह्या चिमुकलीकडे  पाहून ! गोड, गोंडस वाटतंय न ! काही क्षणांसाठी आपणच लहान झाल्यासारखं वाटतंय ! काय  ही डोळ्यातली  निरागसता, काहीतरी बनण्याचं स्वप्न... खूप बोलतात हे डोळे... मला वाटतं आपल्या बहुतेकांची शाळेत अशीच पोझ असावी.. कधी आपली नजर  खिडकीतून बाहेर आकाशात विहरणाऱ्या पक्ष्याकडे असायची तर कधी तोच पक्षी कोणत्यातरी झाडाच्या कुठल्यातरी फांदीवर जाऊन बसेल ह्यावर तर कधी आपण आपल्याच विश्वात रमून बसलेले असायचो. तसेच हिचे डोळे.. तशीच क्युटशी स्माईल :)
  आता तुम्ही म्हणाल  किती गोड गोड लिहितेय मी आज, आता कुठे दिसत असं ही, कुणाला वेळ आहे असं काही बघण्यात किव्हा करण्यात ? प्राक्टीकल असावा माणसाने ! पण ह्यीच  practicality करताना, जगताना  आपण असं स्वस्थ मनापासून फार क्वचितच हसतो.. सतत चिंता, राग, गडबड, वेळ ह्यानेच व्यापले गेलो आहोत आपण.. खिडकीबाहेरच काय कॉम्पुटर च्या विंडो बाहेरच डोकवायला वेळ नसतो आपल्याकडे.. वेळच मिळत नाही असं वेळेला न विचारून सर्रास डीक्लेर करतो आपण... ह्या वाक्ल्याला खूप कॅजुअल्ली बोलतो आपण..  माग अशातून अबोला, दुर्लक्ष, कंटाळ आणि शेवटी गर्वाचा जन्म होतो..
               हळू हळू संवाद कमी  होतो , नंतर बंदच होतो आणि पुन्हा initiate करायला कोणच तयार होत नाही..माग मनमुराद साखोलीच बोलणं.. साखोलीच काय नुसता त्या व्यक्तीशी बोलणं इतिहास जमा होतं..एक वेळ तारे जमीन पर येतील पण हे सारे जमीन पर नाही अवतरणार...

                                                                                - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - आकाश दापले)

Friday, March 20, 2015

सखी

आज वपुंचा 'सखी' हा कथासंग्रह वाचून संपवला. खूप दिवसांनी वाचलं वपुंचं काहीतरी. आणि पुन्हा एकदा जणावलं की कोणी आवडता लेखक विचारल्यावर सगळ्यात आधी सवंतांबरोबर वपुंचं नाव मनात का चमकतं! वपुंचे शब्द जसे काळजाला भिडतात तसं आणि तितक्या ताकतीनं दुसरं काहीच नाही भिडू शकत. त्यांना 'माणूस' हा प्राणी अंतर्बाह्य कळला होता. मला न, वपुंची मानवी मनांची ट्रीटमेंट कांद्यासरखी वाटते. म्हणजे कांद्याचे जसे अगणिक थर असतात अगदी तसंच आपल्या मनाचंही असतं. आणि मग कथा हळूहळू पुढे नेताना ते हलकेच एक एक थर बाजूला करत जातात. वपुंच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला एक प्रकारची खोली असते; म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण डेप्थ म्हणतो. खूपदा मला आश्चर्य वाटतं की इतकी सगळी 'डेप्थ' असणारी माणसं एकाच व्यक्तीला कशी काय भेटू शकतात आणि ती पण एकाच जीवनकालात! पण मग वपुंच्याच शैलीत सांगायचं तर ती खोली, ती 'डेप्थ' समोरच्या माणसात नाही तर बघणाऱ्याच्या दृष्टीत असावी लागते. लेखकचं मन संवेदनशील असतं हे आजवर अनेक ठिकाणी वाचलं असेल तुम्ही. पण जेव्हा ती संवेदना डोळस असते, कोणत्याही मळभाशिवाय, तेव्हाच वपुंच्या पातळीचा लेखक होतो. कारण शेवटी दृष्टीच महत्वाची. खिड़कीच्या काचेवर जर धुळीचा पडदा असेल तर ना आतल्या माणसाला बाहेरचं काही दिसतं आणि ना बाहेरून घरात कोणी डोकवू शकत. लेखकाची पारदर्शक दृष्टी जशी समाजमनाचा अचूक वेध घेते तशीच ती त्याच्या स्वतःच्या अंतर्मनाचा आरसा असते. वपु हे नाव लेखक म्हणून मोठं आहे की माणूस म्हणून हे ठरवणं खरोखर अवघड आहे. त्यांनी मला जी शिकवण दिली ती साधारण अशी आहे - माणसाचं मन म्हणजे महासागरासरखं असतं. सर्वसामान्य माणसं फक्त त्यात वर वर डुंबत राहतात. पण तुम्ही त्यात जितके खोल जाल तितकी आश्चर्यचकित करणारी रत्नं तुमच्या हाती लागत जातात; क्वचित एखादेवेळी हाती गरळही येतो. त्याच्या तळाशी असलेला खजिना आज पर्यंत कोणालाच गवसलेला नाहिये, पण जो अधिकाधिक खोली गाठून जास्तीत जास्त रत्नं आपल्या पुरचुंडीत जमवतो, तो खरा श्रीमंत!
-निकिता

Thursday, March 19, 2015

मी आणि तो

           
                 
                           माणसाच्या मेंदूमध्ये दोन बाजू असतात ..... एक डावी अन एक उजवी ..... डावी बाजू असते न ती आपल्या गणिती आणि तर्क वगैरे बाबींशी निगडीत असते अन उजवी असते ती कला , नवीन विचार यांच्याशी संबंधित असते . तसंच जर विचार केला तर असं जाणवत मला की माणसामध्येही अशा दोन वृत्ती असतात .... एक असते मी अन दुसरी असते तो  .... बऱ्याचदा असं घडतं की जो मी असतो न त्याला कोठे जायचं ... काय करायचं ठाऊकच नसतं... मग अशावेळी तो जो असतो न तो आपल्याला नेहमी मदत करतो ... आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो .... "मी" असतो तो बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी फक्त .... "तो" असतो आपलं अस्तित्व ... आपले अंतरंग अन बराच काही जे एका जन्मात तरी समजणं शक्यच नाही ... मी आणि तो जेव्हा एकमेकांशी बोलतील तेव्हा काय होईल ... मी काय म्हणेल त्याला ..... याबद्दल थोडेसे विचार ....!!!




तूच आहेस तुझ्या
जीवनाचा शिल्पकार
फक्त दे माझ्या
मातीच्या गोळ्याला आकार

अनंत अनंत रंगांचा
तू एक बोलका ठसा
कागदावरल्या नक्षीमधला
सुंदर एक पिसारा जसा

ती नक्षी तू पुन्हापुन्हा कोर
ते रंग तू जप ......
अगदी तळहातावरच्या फोडासारखे

जेव्हा माझ्यामधल कोलाज खदखदत असेल,
तेव्हा तू पेटून उठ ......
मरगळलेले पाश तोड,
त्या कोरीव नक्षीमधले गोल जोड.....
गुदमरणाऱ्या डोहातल विष पिऊन टाक.....
भीतीचं कोडं निर्भीडपणे सोडवून काढ ......

पुन्हा एकदा नेहमीसारखं
कर स्वतःला सिद्ध
जाणवू दे सर्वांना
तुझं अस्तित्व .... माझ्यातलं.....

पुन्हा ठरशील मग तू
माझ्यातला सर्वोत्तम अलंकार
टिकवून ठेवशील तुझ्या - माझ्या
साऱ्या खुणा चिरकाल .....

नेहमीसारखं आजही तू
माझ्या जीवनाचा शिल्पकार
फक्त दे माझ्या
मातीच्या गोळ्याला आकार .....

तूच आहेस तुझ्या
जीवनाचा शिल्पकार
फक्त दे माझ्या
मातीच्या गोळ्याला आकार

                             
                                                                                    - विश्वजीत



Wednesday, March 18, 2015

Abstract

                                                                       
                         शीर्षक सारखा मी आज abstract बोलणारे ... ह्या खाली दिलेल्या  चित्राकडे  बघा ..सुंदर, लक्षवेधी, छानसं चित्र.. रंग कुठलेही वापरले असले, कोणतेही  रंग उधळले असले तरी चित्राची ठेवण मात्र तीच राहतेय .. ब्युटीफुल स्प्लाश ऑफ कलर्स , ग्रसफुल पेंटिंग ! आपल्या मनाचा  एक ग्रह झालेला असतो की फुलांचा रंग नेहमी पांढरा, निळा, गुलाबी, केशरीच  असतो..पण ह्या पेंटिंगकडे पाहून किती फ्रेश वाटतंय , जणू ह्या फुलांना अश्या रंगांनी एक वेगळाच अस्तित्व लाभलाय...वेगळ्या रंगांची उधळण झालेली दिसली तरी ह्या फुलांचा अस्तित्व मात्र टिकून आहे.
                        आपण  ह्या फुलांच्या रंगानसारखं  खूप काही गृहीत धरतो. कधी कुणाचा बोलणं, कधी कुणाचा वागणं आणि कधी कधी तर आपल्या माणसांनाच गृहीत धरतो.. ह्या कोमल फुलांवर होणाऱ्या रंगफेकीप्रमाणे शब्दांची भाडीमाराचीआवाजाची उधळण आपल्यावरही होत असते...त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न आपआपल्या पद्धतीने करत असतो आपण.. केव्हा केव्हा तर ही होळी इतका तीव्र असते की त्यातून बाहेर पडणे जर कठीण होऊन बसते... ह्या चित्रातील बाहेर आलेला माणसाचा पाय बहुतेक तेच सांगत असावं...रंगात रंगायचं पण इतकंही नाही की तो  रंगच उतरणार नाही...
                            रंगांच्या शेड्स प्रमाणे माणसालाही वेगवेगळ्या छटा असतात.. कधी फिका, कधी मध्यम तर कधी गडद.. रंग आकाराला घडवतो पण महत्वाचा म्हणजे रंग पार्श्वभूमी सजवतात...कुठलीही गोष्ट  पार्श्वभूमी शिवाय पूर्णच होत नाही, खरंतर गोष्टी पार्श्वभूमी शिवाय सुरूच होऊ शकत नाही... आपण आणि आपला जीवनही असच एका मोठ्या कॅनवासवर केलेलं "Abstract " आहे...छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा बनत जाणारं ...

                                                                                           -अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - गुगल इमेगेस)

Tuesday, March 17, 2015

मुंबईचं स्पंदन .....

अजून दोन महिन्यांनी engineering संपेल, आणि त्याच वेळी मुंबईत पहिल्यांदा पाउल टाकूनही चार वर्ष पूर्ण होतील जवळपास. आय. सी. टी. मध्ये प्रवेश घेताना मुंबई, आमचं कॉलेज, हॉस्टेल सगळ्याच बद्दल मनात एक प्रकारचं कुतूहलही होतं आणि जरा धाकधूक पण. माझ्यासाठी सगळंच नविन होतं. सुरवातीला कितीतरी दिवस कळायचंच नाही हॉस्टेलवर फावल्या वेळेत काय करावं ते. मग त्यावेळी जरा हाताला आणि मनाला चाळा म्हणून बरंच काही लिहून काढलेलं मी. अर्थात त्यातल्या बऱ्याच कविता अगदी शाळकरी पातळीच्या आहेत. पण मुळातच कविता मला कधी फारशी जमलीच नाही. कविता आपसूकच स्फुरावी लागते, बळजबरीनं नाही करता येत. त्यामुळे मला नेहमी सुचलं, जमलं ते म्हणजे गद्य; पद्य जरा रुसलेलंच असतं माझ्यावर!

आत्ता चार वर्षांची रद्दी काढताना हातात पडलं सगळं. आणि रद्दी आवरायची सोडून तेच वाचत बसले मी … एक गोष्ट लक्षात आली; माणसाचं कसं वय वाढतं, तसंच त्याच्या लिखाणाचं पण ते वाढत असतं. पहिल्या वर्षी मुंबईच्या 'लोकल'वर लिहिला एक लेख आहे. आपलं असा बऱ्याचदा होतं न की आपणच लिहिलेलं वाचून आपल्यालाच प्रश्न पडतो की हे खरंच आपणच लिहिलंय का …. अगदी तसंच वाटतं मला हा लेख वाचून.

तशी प्रस्तावना फार लावली मी. आता तुम्हीच वाचा आणि ठरवा!

'वेळ संध्याकाळची … हातात लेखणी … लिहिण्याची हुक्की आली म्हणून काहीतरी लिहिण्यासाठी पुढ्यात पानं घेऊन बसलेली मी … तेवढ्यात हॉस्टेलच्या मागून धडाडत जाणाऱ्या लोकलचा आवाज, बंद खिडकीला न जुमानता आत शिरतो … मुंबईच्या हृदयाचं ते स्पंदन काळजाला साद घालतं … आणि असा वाटून जातं की दिवस-रात्र, आठी प्रहर अव्याहत चालणाऱ्या या मुंबईची जीवन-वाहिनी जर कुठली असेल तर ती आपली लोकल-ट्रेन … रोज आपल्याला आपल्या इष्ट स्थळी पोहचवणारी, आणि कळत-नकळत आपल्याला बरंच काही शिकवणारी …

मी मुळात नाशिकची. त्यामुळे लहानपणी कधीच लोकलशी संबंध आला नाही. हो, पण माझा पहिला लोकल प्रवास मला कायमच लक्षात राहील; कारण आपली पुरती फजिती झालेले प्रसंग माणसाला काही केल्या विसरता येत नाहीत! अकरावीत आम्ही आय. आय. टी.चा प्रौद्योगिक महोत्सव बघायला मुंबईत आलेलो. तोपर्यंत लोकलचा प्रवास काही आमच्या वाटेला आला नव्हता. तिकिट काढून आम्ही फलाट ओलांडून पूल उतरलो, तर समोर आम्हाला हवी असलेली लोकल येऊन उभी राहिली. नेहमीच्या सवयीने आम्ही रमत-गमत लोकलकडे सरकू लागलो. जेव्हा मी चढण्यासाठी हँडलला हात लावला, तेव्हा लोकल सुरूही झाली की हो! आणि माझ्यामागे सगळ्या चढायच्या बाकी! मग कशीतरी हाश-हुश करीत ती चालू लोकल पकडली! लोकल स्टेशनवर फारतर अर्धा मिनिट थांबते. हे तेव्हा आमच्या गावीही नव्हतं! त्यादिवशी पहिल्यांदा मला 'अर्ध मिनिट' किती महत्वाचं असतं याची प्रचीती आली. हा लोकलने मला शिकवलेला पहिला धडा होता!

तेव्हापासून आजपर्यंत मी अनेकदा लोकलने प्रवास केला. गर्दी लोकलला नवी नसली, तरी मला लोकल नवी होती! आणि हळूहळू असं कळलं की डोळे आणि कान उघडे ठेवले की ही गर्दी बरंच काही शिकवून जाते … कधी दहा मिनिटांच्या प्रवासातही मोबाईल वरून सहकाऱ्यांना सूचना देणारा साहेब दिसला, तर कधी भर गर्दीत स्वतःचा तोल सांभाळत, एका हातात पुस्तक घेऊन वाचणारा कष्टाळू विद्यार्थी पहिला. कधी माझ्या शेजारी सूट-बूट घातलेला चकचकीत व्यावसायिक होता तर कधी मळकट कपड्यातला, आंधळेपणाला काठीचा आधार देत, गाणं गाऊन पोटासाठी पैसे मागणारा भिकारी पुढ्यात उभा असे. मी जागेसाठी कडाकडा भांडणाऱ्या काकूही पहिल्यात आणि आपणहून उठून माझ्यासाठी जागा करून देणारे काकाही. स्पर्शासाठी आसुसलेल्या गलिच्छ मनोवृत्तीचाही अनुभव मी घेतलाय …

पण लोकलने मला दिलेला सगळ्यात मोठा अनुभव अगदी वेगळा आहे … नात्यांना घट्ट बांधणारा … इथे आय. सी. टी.त प्रवेश घेतल्यावर माझे शाळेपासूनचे मित्र-मैत्रिणी मला भेटायला पहिल्यांदा आले होते … आम्ही मरीन-ड्राईव्हला जायचं म्हणून माटुंगा स्टेशनला गेलो … तिथे गेल्यावर कळलं की मध्य रेल्वेला मेगाब्लॉक होता. त्यामुळे आम्ही वेस्टर्ननं दादरला जायचं ठरवलं … आम्ही सगळे एकत्रच चढणार होतो, पण लोकलमधली गर्दी पाहून मी आणि माझी मैत्रीण लेखा अखेरच्या क्षणी पळत पळत महिला डब्यात चढलो … तिथे उभं राहिलाही जागा नव्हती … आम्ही अक्षरशः दरवाज्यात लटकून उभं होतो … दादर जवळ येऊ लागलं, तशा बायका उतरायला मिळणार नाही म्हणून धक्का-बुक्की करू लागल्या … स्टेशन लागलं तेव्हा कानावर आलं की मागच्या डब्यातली एक मुलगी रुळावर पडली … कसातरी आम्ही आमचा जीव त्या गर्दीतून फलाटावर उतरवला … इकडे आमच्या मित्रांनी त्यांच्या डब्यात एवढंच ऐकलं की कोणी एक मुलगी रुळावर पडली. त्यात माझा एक अतिशय जिवाभावाचा मित्र, मित्र नव्हे भाऊच, हिमांशू होता. ते उतरताच आम्हाला शोधायला आले. आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा हिमांशुच्या डोळ्यात पाहिलेली भावनांची रंगपंचमी मी सात जन्मात विसरणार नाही … आधी पोटतिडकीची काळजी, मग आम्ही सुखरूप आहोत हे कळल्यावर हळूहळू झिरपलेला आनंद … शब्दांत नाही मांडता येणार व्यवस्थित … पण मला असं वाटलं की मला सख्खा भाऊ असता तर इतकाच घाबरला असता कदाचित …

कधी गोड, कधी कडू … बरेच अनुभव दिले लोकलने. असंख्य मनोवृत्तींची माणसंही पाहायला मिळाली … खूप शिकवलं … पण वाटतं, अजून शिकायचंय, अजून जग अनुभावायचय … तेवढ्यात हॉस्टेलच्या मागून दूसरी लोकल धडाडत जाते आणि लक्षात येतं, की घाई काहीच नाहीये … अजून कमीत कमी साडेतीन वर्ष रहायचय मुंबईत … !!!'

-निकिता   

Saturday, March 14, 2015

माणसं

                                                                   माणसं
        समाजातला एक जीवंत घटक , खरंतर समाजाला जीवंत करणारा घटक . काही सारखे ,काही भिन्न, काही हुशार , शहाणे, काही खूप प्रेमळ तर काही कटकटी :p  प्रत्येकात एक न एक वेगळा गुण असतोच, एक कला असते, एक छंद असतो ज्याचा गंध कधी सरळ पसरतो तर कधी त्या गंधांची शाखा होऊन सर्वत्र  पसरतो...
         काही माणसं वेगळीच असतात , त्यांचा प्रत्येक गुण बघणं आपल्यासाठी एक सोहळाच असतो जणू .. आता हेच बघा न, दुसऱ्यांना समजावणारी , दुसर्यांच्या  मनातला ते सांगण्याआधीच जाणत असणारी...किती छान वृत्ती आहे न ही... न सांगता, न बोलता त्यांना आपली मनस्थिती  अलगद उमजते...जणू आपला आरसाच असतात ती.. दर्पणात कसा आपल्याला आपण दिसतो तसाच त्यांच्या दर्पणरुपी मनात आपल्याला आपण दिसतो :)
           चांगल्या वृत्तीची मनाला भावणारी खूप लोक भेटतात, काहींशी संवाद वाढतो , पुढे  मैत्री वाढते, काहींशी तिथला तिथेच राहतो तर काहींशी थोड्या काळानंतर पुन्हा जुळून येतो ... एका विशिष्ट ग्रुप ऑफ पीपल चं मला जाम अप्रूप वाटतं, अलग कलात्मक असतात राव ती.. सर्वच जमत त्यांना..सर्वगुणसंपन्न   हट्स ऑफ टू धेम ...  काही हुशार  , ज्ञानी, काही दानी, कर्तृत्ववान ..अलंकार असतात अशी माणसं समाजासाठी..
            काही माणसांच्या कलेत  रंगून जावस वाटतं, ज्ञानातून वाट काढावीशी वाटते, त्यांच्या कर्तृत्वात आपणही दैदिप्यमान व्हावासा वाटतं.. हं पण त्यासाठी नुसता वाटण्यापेक्षा "कृती" करावी लागणारे. काही सोपे पण महत्वाचे बदल केले पाहिजेत  आपण आपल्यात . आता ते नेमके कोणते ते प्रत्येकावर  आहे. माणसामाणसात भिन्न गुण असतात तसच ते बदल कोणत्या स्वभावात, कोणत्या गुणात करावे ते ही वेगळे असतात. विचार करा नक्की सापडेल :)
                             
                                                                                                             - अपूर्वा  :D

       

लहानगा



मोठं होता होता बऱ्याचदा लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात ..... कितीही मोठे झालो तरी पुन्हा लहान होण्याची इच्छा जाग्या करतात .... लहानपणी कसं एकदम छान अलबेल होता असं वाटू लागतं मनाला ... मन म्हणू लागतं मग ... " लहानपण देगा देवा " ......आणि सांगू लागतं आपल्याला ..... " तू पुन्हा लहानगा व्हावं " .........

निसुर पठाराने
पुन्हा गुलाबी थाट घ्यावा
अन मन सांगे ओरडून
"तू पुन्हा एकदा लहानगा व्हावा"

चौफेर उधळणाऱ्या प्रश्नांनी
पुन्हा धावत्या पाण्याचा वेग घ्यावा
चक्रावलेल्या नजरेनं
इंद्रधानुश्यातल्या रंगांचा मागोवा घ्यावा

पाणावल्या डोळ्यांनी बापाकड
फिरायला न्यायचा हट्ट करावा अन
फुलांचा राजा गुलाबच का ???
सुर्यफुल का नाही !!! असं वेडा प्रश्न करावा

घोडा घोडा म्हणून सहजच
"मोत्या"च्या पाठीवर "स्वार" व्हावं
आणि घोड्यावर बसण्यापूर्वी मात्र
आईच्या पदरामागे जाऊन लपावं

बोळातल्या त्या कोपऱ्यात पुन्हा
गोट्या-लगोरीचा खेळ रंगावा
वर्गात शेवटच्या बाकावर बसून आजही
तुफान धुडगूस घालावा

गेलेल्या वेळानं दाहीदिशा
सर्वस्व पणाला लावून शोधावं
अन लहानपणीच्या गोंडस आठवणींना
काळाच्या विस्तीर्ण पडद्यावर मांडावं

वयाचं गणित आणि काळाचा ताळमेळ
साफ साफ चुकावा
अन मन सांगे ओरडून
"तू पुन्हा लहानगा व्हावा"

अन मन सांगे ओरडून
"तू पुन्हा लहानगा व्हावा" ....

लहानपण हे माणसाच्या आयुष्यातलं खूप मोठ्ठ लेणं आहे . लहानपणीचे बरेच फोटो वगैरे असतील .... पण बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आठवणी या त्या फोटोस मध्ये बसण्यासारखा नव्हत्या .... कधी बसूही नाही शकत ...पण ते जगलेले क्षण, त्या जगलेल्या आठवणी याच चिरकाल आपल्यासोबत असतात ... आपल्यासोबत राहतात ... हीच किमया आहे लहानपणाची .... आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या लहानपणाची .....


                                                                                                            -विश्वजीत



Friday, March 13, 2015

नमस्काराचा उपचार !!!

नमस्कार मंडळी …….

आज-काल 'नमस्कार' वगैरे सारखे शब्द जरा कमीच कानी पडतात नाही का ! आता रुजलेली पद्धत म्हणजे 'hi guys ... how's life?' अर्थात मी पण बहुतेकदा अगदी हेच उद्गार काढलेले असतात कोणाला भेटल्यावर. पण ओसाड माळरानात चालता चालता अचानक पाण्याचा नितळ झरा नजरेस पडावा तसं कधीतरी कॉलेजची 'सांस्कृतिक मंडळी' भेटतात आणि 'नमस्कार'चं संबोधन कर्णसुख देऊन जातं. मग अवचित कधी तिथं त्या घोळक्यात जरा रेंगाळण होतं; अर्थात या engineering मधून जरा जरी वेळ मिळाला तर! मग सहाजिकच गप्पांना तोंड फुटतं. कोणी नुकताच पाहिलेल्या चित्रपटाबद्दल सांगता, कोणी आत्ताच वाचून संपवलेल्या पुस्तकाचं रेडीमेड विवेचन पुरवतं. कधी-कधी अगदी काहीच खास विषय नसतो पण तास दोन तास कधी गेले हे कोणालाच समजत नाही. अचानक कोणाचा तरी फोन वाजतो आणि सगळ्यांनाच आपल्या तुंबलेल्या कामाचं स्मरण होतं. आपण नेहमी भेटत राहायला हवं, अशा गप्पा कायम व्हायला हव्या अशी इच्छा सगळेच व्यक्त करतात; तसं वचनही देतात एकमेकांना. आपलं मराठीपण जरा जपल्याच्या समाधानात प्रत्येक जण असतो. पण त्यानंतर तसाच योग परत जुळून यायला चांगले तीन-चार महिने उलटून गेलेले असतात. 

दरम्यानच्या काळात मनात बरंच काही खलत असतं, अनेकदा विचारांचं वादळ मेंदूत थैमान घालतं. पण ते व्यक्त करायला एक तर वेळ नसतो नाही तर माणूस. आणि असे विचार जेव्हा आपण दाबून टाकायला लागतो न तेव्हा आपलं मन हळू हळू बोथट, असंवेदनशील होऊ लागतं. शरीराप्रमाणेच मग मनही आजारी होऊन जातं. 

या विचारानं मन अस्वस्थ झालं माझं. आणि यावर उपाय सापडला तो म्हणजे लिखाण. मला वाटतं समोरच्याला समजायला सोप्पं जाईल अशा रितीनं व्यक्त व्हायला लिखाणासारखं दुसरं साधन नाही. आणि त्याच्या उद्देश जर फक्त व्यक्त होण्यापलीकडे जाऊन माणूस जोडणं असा ठेवला तर त्यातून अतिशय सुंदर आणि उदात्त आविष्काराची निर्मिती होते. 

अशाच काही गप्पा, काही विचार घेऊन आम्ही तुमच्या भेटीला वेळोवेळी येत जाऊ. या व्यासपीठावर मी, निकिता आवारे, आणि माझे दोन सवंगडी अपूर्वा तायडे आणि विश्वजीत पाटील आपले विचार तुमच्याशी share करणार आहोत. आणि हो … अगदी काही अवघड, अवजड मराठी किंवा फक्त मराठीचाच अट्टाहास असा काहीही तुम्हाला आमच्या blog वर दिसणार नाही, कारण मनं जोडायला फक्त भावनाच पुरेशा असतात !!!

मात्र तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यात आळस मात्र करू नका हा … हा संवाद घडावा आणि उत्तरोत्र रंगत जावा हीच शारदाचरणी प्रार्थना ……