
अजून दोन महिन्यांनी engineering संपेल, आणि त्याच वेळी मुंबईत पहिल्यांदा पाउल टाकूनही चार वर्ष पूर्ण होतील जवळपास. आय. सी. टी. मध्ये प्रवेश घेताना मुंबई, आमचं कॉलेज, हॉस्टेल सगळ्याच बद्दल मनात एक प्रकारचं कुतूहलही होतं आणि जरा धाकधूक पण. माझ्यासाठी सगळंच नविन होतं. सुरवातीला कितीतरी दिवस कळायचंच नाही हॉस्टेलवर फावल्या वेळेत काय करावं ते. मग त्यावेळी जरा हाताला आणि मनाला चाळा म्हणून बरंच काही लिहून काढलेलं मी. अर्थात त्यातल्या बऱ्याच कविता अगदी शाळकरी पातळीच्या आहेत. पण मुळातच कविता मला कधी फारशी जमलीच नाही. कविता आपसूकच स्फुरावी लागते, बळजबरीनं नाही करता येत. त्यामुळे मला नेहमी सुचलं, जमलं ते म्हणजे गद्य; पद्य जरा रुसलेलंच असतं माझ्यावर!
आत्ता चार वर्षांची रद्दी काढताना हातात पडलं सगळं. आणि रद्दी आवरायची सोडून तेच वाचत बसले मी … एक गोष्ट लक्षात आली; माणसाचं कसं वय वाढतं, तसंच त्याच्या लिखाणाचं पण ते वाढत असतं. पहिल्या वर्षी मुंबईच्या 'लोकल'वर लिहिला एक लेख आहे. आपलं असा बऱ्याचदा होतं न की आपणच लिहिलेलं वाचून आपल्यालाच प्रश्न पडतो की हे खरंच आपणच लिहिलंय का …. अगदी तसंच वाटतं मला हा लेख वाचून.
तशी प्रस्तावना फार लावली मी. आता तुम्हीच वाचा आणि ठरवा!
'वेळ संध्याकाळची … हातात लेखणी … लिहिण्याची हुक्की आली म्हणून काहीतरी लिहिण्यासाठी पुढ्यात पानं घेऊन बसलेली मी … तेवढ्यात हॉस्टेलच्या मागून धडाडत जाणाऱ्या लोकलचा आवाज, बंद खिडकीला न जुमानता आत शिरतो … मुंबईच्या हृदयाचं ते स्पंदन काळजाला साद घालतं … आणि असा वाटून जातं की दिवस-रात्र, आठी प्रहर अव्याहत चालणाऱ्या या मुंबईची जीवन-वाहिनी जर कुठली असेल तर ती आपली लोकल-ट्रेन … रोज आपल्याला आपल्या इष्ट स्थळी पोहचवणारी, आणि कळत-नकळत आपल्याला बरंच काही शिकवणारी …
मी मुळात नाशिकची. त्यामुळे लहानपणी कधीच लोकलशी संबंध आला नाही. हो, पण माझा पहिला लोकल प्रवास मला कायमच लक्षात राहील; कारण आपली पुरती फजिती झालेले प्रसंग माणसाला काही केल्या विसरता येत नाहीत! अकरावीत आम्ही आय. आय. टी.चा प्रौद्योगिक महोत्सव बघायला मुंबईत आलेलो. तोपर्यंत लोकलचा प्रवास काही आमच्या वाटेला आला नव्हता. तिकिट काढून आम्ही फलाट ओलांडून पूल उतरलो, तर समोर आम्हाला हवी असलेली लोकल येऊन उभी राहिली. नेहमीच्या सवयीने आम्ही रमत-गमत लोकलकडे सरकू लागलो. जेव्हा मी चढण्यासाठी हँडलला हात लावला, तेव्हा लोकल सुरूही झाली की हो! आणि माझ्यामागे सगळ्या चढायच्या बाकी! मग कशीतरी हाश-हुश करीत ती चालू लोकल पकडली! लोकल स्टेशनवर फारतर अर्धा मिनिट थांबते. हे तेव्हा आमच्या गावीही नव्हतं! त्यादिवशी पहिल्यांदा मला 'अर्ध मिनिट' किती महत्वाचं असतं याची प्रचीती आली. हा लोकलने मला शिकवलेला पहिला धडा होता!
तेव्हापासून आजपर्यंत मी अनेकदा लोकलने प्रवास केला. गर्दी लोकलला नवी नसली, तरी मला लोकल नवी होती! आणि हळूहळू असं कळलं की डोळे आणि कान उघडे ठेवले की ही गर्दी बरंच काही शिकवून जाते … कधी दहा मिनिटांच्या प्रवासातही मोबाईल वरून सहकाऱ्यांना सूचना देणारा साहेब दिसला, तर कधी भर गर्दीत स्वतःचा तोल सांभाळत, एका हातात पुस्तक घेऊन वाचणारा कष्टाळू विद्यार्थी पहिला. कधी माझ्या शेजारी सूट-बूट घातलेला चकचकीत व्यावसायिक होता तर कधी मळकट कपड्यातला, आंधळेपणाला काठीचा आधार देत, गाणं गाऊन पोटासाठी पैसे मागणारा भिकारी पुढ्यात उभा असे. मी जागेसाठी कडाकडा भांडणाऱ्या काकूही पहिल्यात आणि आपणहून उठून माझ्यासाठी जागा करून देणारे काकाही. स्पर्शासाठी आसुसलेल्या गलिच्छ मनोवृत्तीचाही अनुभव मी घेतलाय …
पण लोकलने मला दिलेला सगळ्यात मोठा अनुभव अगदी वेगळा आहे … नात्यांना घट्ट बांधणारा … इथे आय. सी. टी.त प्रवेश घेतल्यावर माझे शाळेपासूनचे मित्र-मैत्रिणी मला भेटायला पहिल्यांदा आले होते … आम्ही मरीन-ड्राईव्हला जायचं म्हणून माटुंगा स्टेशनला गेलो … तिथे गेल्यावर कळलं की मध्य रेल्वेला मेगाब्लॉक होता. त्यामुळे आम्ही वेस्टर्ननं दादरला जायचं ठरवलं … आम्ही सगळे एकत्रच चढणार होतो, पण लोकलमधली गर्दी पाहून मी आणि माझी मैत्रीण लेखा अखेरच्या क्षणी पळत पळत महिला डब्यात चढलो … तिथे उभं राहिलाही जागा नव्हती … आम्ही अक्षरशः दरवाज्यात लटकून उभं होतो … दादर जवळ येऊ लागलं, तशा बायका उतरायला मिळणार नाही म्हणून धक्का-बुक्की करू लागल्या … स्टेशन लागलं तेव्हा कानावर आलं की मागच्या डब्यातली एक मुलगी रुळावर पडली … कसातरी आम्ही आमचा जीव त्या गर्दीतून फलाटावर उतरवला … इकडे आमच्या मित्रांनी त्यांच्या डब्यात एवढंच ऐकलं की कोणी एक मुलगी रुळावर पडली. त्यात माझा एक अतिशय जिवाभावाचा मित्र, मित्र नव्हे भाऊच, हिमांशू होता. ते उतरताच आम्हाला शोधायला आले. आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा हिमांशुच्या डोळ्यात पाहिलेली भावनांची रंगपंचमी मी सात जन्मात विसरणार नाही … आधी पोटतिडकीची काळजी, मग आम्ही सुखरूप आहोत हे कळल्यावर हळूहळू झिरपलेला आनंद … शब्दांत नाही मांडता येणार व्यवस्थित … पण मला असं वाटलं की मला सख्खा भाऊ असता तर इतकाच घाबरला असता कदाचित …
कधी गोड, कधी कडू … बरेच अनुभव दिले लोकलने. असंख्य मनोवृत्तींची माणसंही पाहायला मिळाली … खूप शिकवलं … पण वाटतं, अजून शिकायचंय, अजून जग अनुभावायचय … तेवढ्यात हॉस्टेलच्या मागून दूसरी लोकल धडाडत जाते आणि लक्षात येतं, की घाई काहीच नाहीये … अजून कमीत कमी साडेतीन वर्ष रहायचय मुंबईत … !!!'
-निकिता