Saturday, August 27, 2016

सुसंवाद


आज खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता त्यांना. निवांत म्हणजे दोन नोकरदार मुंबईकरांना आठवड्याच्या दिवशी जितका निवांत मिळू शकेल, तितका निवांत. पुणेकरांना रोजच दुपारच्या जेवणानंतर मिळतो तसा नव्हे! असो ... तर दोघांनाही आज ऑफिसमधून लवकर सुट्टी मिळाल्यामुळे हा योग खरंतर जुळून आला होता, आणि मग आपसूकच त्यांची पावलं वळाली ती मरीन ड्राईवच्या दिशेनं.

ते तिथं पोहचले तेव्हा ऊन तसं उतरायला लागलं होतं. चौपाटीवरून एक भेळेचा पुडा त्यांनी बांधून घेतला आणि समुद्राकडे तोंड करून मरीन ड्राईवच्या त्या कट्ट्यावर बसले. मागे एकदा ती त्याला म्हणाली होती ... “मला न हा कट्टा म्हणजे एक boundary वाटतो. सीमारेषा ... मुंबई आणि समुद्राच्या मधली, शहर आणि निसर्गामधली, कोलाहल आणि शांततेमधली. म्हणजे बघ ना, एकदा समुद्राकडे तोंड करून इथे बसलं, की तुझ्या पाठीशी अख्खी मुंबई असते. अव्याहत धावणारी, कधीही न थांबणारी; व्यस्त मुंबई. पण तरीही, एकदा समुद्राकडे तोंड करून बसलं की अंगावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या, किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटांच्या लयीत हरवायला झालं, की बटन दाबून बंद केलेल्या रेडिओ सारखं मुंबईचा आवाज बंद होतो. लोक म्हणतात खूप वेळा, ‘कंटाळा आलाय आयुष्याचा. कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जावून बसावं शांतता शोधायला.’ पण मी म्हणते गरजच काय त्याची ? इथे तेच तर मिळतंय तुम्हाला. आणि खरं म्हंटलं तर इथे बसलो तरी मुंबईतच आहोत आपण; पण तरीही मुंबईत नाही. फक्त दिशा बदलली की संदर्भ बदलला. शिवाय समोर दिसणारा समुद्र खूप सुंदर, निळाशार दिसतो, मनाला भुरळ घालणारा असतो असंही नाही. पण जे आहे, जसं आहे ते त्या क्षणापुरतं खरं असतं, सुंदर असतं, निवांत असतं ... आणि हीच खरी जादू आहे इथली.”

तिचा हा dialogue आठवला तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. फिल्मी वाटतं आपल्याला वाचून, पण त्याला सवय होती. आता लेखीकेबरोबर असायचं म्हणजे अशा विधानांची म्हणा, अशा संवादाची सवय लागणं हे साहजिकच होतं. पण काही वेळेस फक्त ऐकून भागेलच असं नाही. त्यावर तिला त्याची प्रतिक्रियाही हवी असायची. तोही मग प्रयत्न करायचा. आणि म्हणूनच, ती भेटल्यापासून त्याची विचार करायची क्षमता, पद्धत खूपच सुधारली होती. तिच्याबरोबर प्रत्येक क्षणाला त्याला काहीतरी नवं शिकायला मिळत होतं. नेमकं हेच त्याला तिच्याबाबतीत सगळ्यात जास्त आवडलं होतं. खूप मनापासून enjoy करत होता तो त्यांचं नातं.       

नेहमीप्रमाणे सुरवातीला चाललेली तिची अखंड बडबड त्यानं व्यवस्थित ऐकून घेतली. मग मग जसा जसा सूर्य क्षितिजाकडे झुकू लागला तसं तसं तिचं बोलणं कमी होत गेलं. आणि त्याचा हात हातात घेऊन तो सूर्यास्त पाहताना, सगळे शब्दच जणू त्या सूर्याबरोबर मावळून गेले. समुद्राची शांत करणारी गाज ऐकत जवळपास अर्धा तास ती दोघं तशीच बसून राहिली. जशी तिच्या बडबडीची सवय होती, तशी तिच्या या शांत बसण्याची, अंतर्मुख होण्याचीही होती. त्याला माहित होतं, ही शांतता वरवरची आहे, त्या समोरच्या समुद्रासारखी. आत खूप काही चालू असतं तिच्या. आणि मग विचारांच्या त्या प्रवाहाला गती मिळाली की किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांसारखे आपोआपच ते तिच्या ओठांवर येतात. आणि मग अचानक ती बोलली ...

“मला सांग, कधी उन्हाळ्याच्या रात्री, गच्चीवर बसून निवांतपणे चांदण्या मोजल्या आहेस तू? बसनं प्रवास करताना खिडकीतून दिसणारा चंद्र बघितलाएस तो दिसेनासा होईपर्यंत? कोणाशी तरी खूप बोलायचंय म्हणून तुम्ही समुद्रावर जाऊन बसलात आणि तिथं गेल्यावर मात्र संपूर्ण वेळ फक्त वाऱ्याची गाज ऐकत बसलात, आपण आत्ता बसलोय तसं ... असं झालंय कधी? तू trekkingला जातोस नं? अख्खा दिवस घाम गाळून, डोंगर चढल्यावर शेवटी जेव्हा कळसावर पोहचतोस तेव्हा काय वाटतं तुला?”

“अवघा निसर्गच माझ्याशी बोलतोय, असं काहीसं ...”

“हीच तर खरी गम्मत आहे अरे! निसर्ग मुळीच बोलत नसतो. आपणच बोलत असतो आपल्याशी! आता चांदण्या रात्री आपण जी शीतलता अनुभवतो ती काही चांदण्यांची असते का? तारका म्हणजे अग्निलोळ आणि त्या अर्थी त्यांचा धर्म तेजाचा ... मग आपल्याला जाणवणारा गारवा कुठून येतो? तो मनातच असतो आपल्या ... आपल्याच मनातला एक थंडगार कोपरा आपल्याला गवसलेला असतो त्या कौमुदी प्रकाशात ... चंद्राचंही तसंच ... त्याच्या त्या मोहवणाऱ्या मुद्रेत आपलंच प्रेम परावर्तीत होत असतं ... समुद्राच्या लाटांच्या गाजेत आपल्या विचारांची कंपनं असतात ... आणि डोंगरमाथ्यावरून जाणवणारी निसर्गाची भव्यता ही आपल्याच अंतरंगाची व्याप्ती असते ... आपल्याला वाटतं की आपल्याला जाणवणाऱ्या positive waves हे निसर्गाचं देणं आहेत. पण तो उगम नाहीये. त्याचं काम फक्त पाऱ्याचं, दर्पणाचं आहे. काहीसं amplifier चं ... पण जे काही असेल; कोलाहल, शांतता, प्रेम ... सगळं काही आपलंच असतं. निसर्ग फक्त ते आपल्याला शोधायला मदत करतो. आणि म्हणूनच आपल्याला त्याच्या सानिध्यात कोलाहलातली शांतता आणि शांतातेतील कोलाहल, दोन्ही समजून घेता येतं. आणि मग आपण म्हणतो, ‘इथे आलं की एक प्रकारचं peace of mind मिळतं यार ...’ शेवटी हे peace of mind म्हणजे तरी काय असतं अरे ... आपला आपल्याच मनाशी चाललेला सुसंवाद ... शब्दहीन ...”

तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला जेव्हा पूर्णपणे उमगला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मघाच सारखं एक अर्थपूर्ण हसू उमललं. इतका वेळ त्याला वाटत होतं ती त्याच्याशी बोलतेय. पण तीच म्हणाली तसं, हा संवाद त्यांच्यातला नव्हताच मुळी. ती आत्ता सुद्धा आपल्याच मनाशी बोलत होती ....


-    निकिता        

Tuesday, June 14, 2016



अशी माणसे येती!
             स्पृहा जोशी ची प्राजक्तही कविता मला खूप आवडते आणि जाणीव होते कि प्राजक्ता सारखी नाजूक, निर्मळ सुंदर गोष्टी, अनुभव, भावना, वस्तू ह्याचं ही आयुष्यात स्थान आहे. गुलाबाकडे विशालता असून सुद्धा काही माणसं प्राजक्ता सारख्या गोष्टींकडे वळतात. ते मोठे अवाढव्य नसले तरीही त्यात कोमलता, नाजुकपणा असतो आणि मुख्य म्हणजे ती त्या व्यक्तीची निवड असते.
माणसांना जाणून घेण्याचा आनंद वेगळाच असतो. काही माणसं नं वेगळंच असतं… त्यांच्याकडे सगळं असून देखील केवळ दुसऱ्यांच भलं व्हावं म्हणून झटत असतात...अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण असून सुद्धा दुसर्यांच्या प्रगतीसाठी त्यांची धडपड सुरुच असते. मग ते सध्या बोलण्यातून असो, अथवा शिकवण्यातून, आणि ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता. अत्यंत निरपेक्ष भावनेने आपल्या ज्ञानामृतचा, अनुभवामृतचा ठेवा लोकांना देत असतात. रक्ताच्या नात्या पलीकडची नाती असतात ही! खरंच समृद्ध असतात अशी माणसं आणि आपल्याला समृद्ध करतात!
जितकी प्रेमळ असतात अगदी तितक्याच हक्काने चुका सुद्धाही मोठ्या तत्परतेने सांगतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखा खूप असतं. प्रत्येक गुणातून सदैव प्रेरणाच मिळत असते. एक उत्तम आणि well balanced व्यक्तीच असतात जणू! खरंच अशा माणसांच्या गुणांच्या नखाची सर जरी आम्हाला लागली तर आयुष्य सार्थकी लागल्याची धन्यता मिळेल.
स्वतःवर पूर्ण विश्वास असला की अख्ख जग जिंकता येत हे ते खात्रीपूर्वक सांगतात. गुरु, मित्र, तत्वज्ञ, दिशादर्शक अशी सगळीच रूपे त्यांच्यात एकत्र बघायला मिळतात ज्यांच्या बद्दल अप्रूप वाटणं चुकीचं ठरणार नाही. ह्या पृथ्वी वरील rare species मधील आहे ही जी आपल्या अनुभवाची, ज्ञानाची शिदोरी दुसर्यांच्या हितासाठी उघडतात.
ज्यांना किती ही धन्यवाद म्हटलं तरी पुरणार नाही असं योगदान असतं त्यांचं आपल्या जीवनात.
 आयुष्याच्या साठवणीतील आठवणीची माणसं!
- अपूर्वा

Friday, February 26, 2016

कोलाज


एक निवांत संध्याकाळ ....
बसारीमधून ऐकू येणारे आर्त स्वर ,
त्यातच घुमणारा तबल्याचा ताकधीनचा आवाज,
चहूकडे दुमदुमलेली तीन तालाची पकड

आणि....
अशाच निवांत क्षणी
तुझ्या अंतरंगातील अनंत रंगांनी रंगलेल्या भावना
त्या कॅनव्हास वर शिंपड ....

ज्याप्रमाणे सागराच्या तळाला मोत्यासारखे रत्न
निर्माण करणाऱ्या शिंपल्याला
कर्णशिलांजवळ नेउन धरलं
तेव्हा सागराचा जसा निनाद ऐकू येतो
तसंच अगदी तसंच
त्या शिंपडलेल्या  भावनांना हृदयाजवळ घट्ट धर ....
तोच तुला असं जाणवेल ....
की .... ती जणू तुझी प्रतिमाच आहे
जणू तुझं दुसरं अस्तित्त्वच आहे ....

तुझ्या शुद्ध स्वरूपातल्या मनाचे, बुद्धीचे, नीतीचे,
मतिचे, गतीचे ,विचारांचे आणि आचारांचे ....
ते कोलाजच आहे जणू.....
त्या कोलाजातील सुंदर दिसणारे
आणि कांतीने झळाळणारे ठिपके जोड
स्वतःला त्यामध्ये गुंतवून घे, समरसून घे
आणि जग .....

त्या कॅनव्हासवर तुला हव्यानाकोश्या
साऱ्या भावना शिपड आणि जग .... फक्त जग .....



- विश्वजीत