Saturday, October 10, 2015

गंध मातीचा

खूप दिवसांनंतर ब्लॉग वर काहीतरी लिहायला वेळ मिळाला (काढलाच म्हणा) .... अचानक आलेल्या शिथिलतेचा इथेच खंड करून नवीन उर्जेने पुनरुज्जीवन करण्याचा आमचा मानस आहे.

ही कविता आपली माती, आपली नाती, आपली माणसं या सर्वांना अर्पण. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्फूर्तीला सलाम. काळाच्या ओघात पुढे जात असताना काही मुलभूत प्रश्न मांडण्याचा आणि त्याद्वारे माणुसकीच काय होईल  याचा आपण सर्वांनीच विचार करणे क्रमप्राप्त आहे.

  
स्पंदनांची बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

हृदयाला धडधडण
याच्या पलीकडंही
खूप काही ठाऊक असतं
जाणीवेचा प्रतिबिंब
असतं हृदय ... हे आता
समजावेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

बीजाला पेरण
खतपाणी देणं
फुटलेल्या अंकुरची
जीवापाड काळजी घेणं
या जगात हे सारं
शिकवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

सारंकाही ठीकठाक
म्हणता म्हणता
अचानक्तेचा गौप्यस्फोट
होता होता
सावध राहण्याची गरज
सांगेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

जगणं दुसऱ्यांसाठीच
बाळकडू देणारं
"स्व”तःच्या खिडकीपलिकडच
नयनरम्य दृश्य पाहण्याचं
प्रवाह विचारांच्या अशा
टिकवेल का कोणी...
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

जन्माचं कारण
शून्याचा उगम
अस्ताच प्रारब्ध
उलगडणारी रहस्य
आता उलगडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

सजीव असण्यामागच
प्रेम करण्यामागच
मायेच्या ओलाव्याने
जवळ घेण्याचं
गणित सोडवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

स्पंदनांची बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा

जपेल का कोणी ?


           विश्वजीत




Sunday, October 4, 2015

"गर्दी"श में तारे

                                                                    "गर्दी"श में तारे
कधी कधी प्रश्न पडतो - गर्दी बरी का एकांत?! गर्दी, गोंधळ, गडबड असतच आजूबाजूला. ती असल्याशिवाय काम पुढे जात नाही आणि हल्ली तर वेळही नाही! ते म्हणतात नं कुठलीही गोष्ट, व्यक्ती, वस्तू नसली तरचं त्याची किंमत जाणवते, ते अगदी खरं आहे. शांततेच्या गावी गर्दीचे सूर गवसतात आणि गर्दीत असताना स्तब्धतेची आठवण होते. आज अचानक आजूबाजूला स्मशान शांतता जाणवतेय !
आणि अचानक ध्यानी येतं की नकळत सवय लागली आहे आपल्याला गर्दीची, गर्दीतल्या माणसांची आणि माणसांच्याही गर्दीची. गणपती आले आणि गेले, काल पाऊसही येउन गेला.. त्यामुळे परत कोरड पडली आहे. ओलावाही नाही आणि भावनाही ...मग कुठूनतरी धाडकन आवाज येतो कसलातरी...तात्पुरता नकोसा वाटतो पण मौन धारण केल्यावर आपणही गप्प बसतो!!!
मध्यरात्री किव्हा भर पहाटे गडबड जास्त नसल्याची जाणवते आणि अचानक खूप काही गोष्टी डोळ्यासमोर आणि मनात तरंगू लागतात...  मनाने वाट मोकळी करून द्यायची ठरवली तर किती मार्ग असतात नं !
 आपल्यला आवडत असो वा नसो, पण गर्दी खूप काही शिकवते माणसाला! स्टेशनला ब्रिजवर गर्दीत मधेच उभी किंव्हा खाली बसलेली म्हातारी, तिचे पाणावलेले डोळे, पसरलेले हात, केवीलवाणी नजर, सुरकुत्या पडलेलं कृष, अशक्त शरीर.... कसं जगायचं, कसं चालायचं, कसं वागायचं, कसं झेलायचं, कसं  बोलायचं हे शिकवतो  गजबजाट... समाजाला जिवंतपणा देण्याचा काम गर्दी देते. आवाजाने घेरलेल्या "आपल्याला" आयुष्यभर प्रत्येक क्षणी ती असावी आसपास असावी असं वाटतं. ह्या कोलाहलात सकाळ कधी होते कळतच नाही.. मधल्या काळात गर्दीची आठवण आणि आठवणींची गर्दी येउन झालेली असते...मग शांत असलेल्या वातावरणरुपी कॅन्वासात आवाजाचे रंग भरायला सुरुवात होते ….   जसं आपल्या मोकळ्या, काळ्या आकाशात आपल्या कल्पकतेच चांदणं चमकतं !!! :)

                                                                   - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - गुगल इमगेस pixcooler.com )