Sunday, October 4, 2015

"गर्दी"श में तारे

                                                                    "गर्दी"श में तारे
कधी कधी प्रश्न पडतो - गर्दी बरी का एकांत?! गर्दी, गोंधळ, गडबड असतच आजूबाजूला. ती असल्याशिवाय काम पुढे जात नाही आणि हल्ली तर वेळही नाही! ते म्हणतात नं कुठलीही गोष्ट, व्यक्ती, वस्तू नसली तरचं त्याची किंमत जाणवते, ते अगदी खरं आहे. शांततेच्या गावी गर्दीचे सूर गवसतात आणि गर्दीत असताना स्तब्धतेची आठवण होते. आज अचानक आजूबाजूला स्मशान शांतता जाणवतेय !
आणि अचानक ध्यानी येतं की नकळत सवय लागली आहे आपल्याला गर्दीची, गर्दीतल्या माणसांची आणि माणसांच्याही गर्दीची. गणपती आले आणि गेले, काल पाऊसही येउन गेला.. त्यामुळे परत कोरड पडली आहे. ओलावाही नाही आणि भावनाही ...मग कुठूनतरी धाडकन आवाज येतो कसलातरी...तात्पुरता नकोसा वाटतो पण मौन धारण केल्यावर आपणही गप्प बसतो!!!
मध्यरात्री किव्हा भर पहाटे गडबड जास्त नसल्याची जाणवते आणि अचानक खूप काही गोष्टी डोळ्यासमोर आणि मनात तरंगू लागतात...  मनाने वाट मोकळी करून द्यायची ठरवली तर किती मार्ग असतात नं !
 आपल्यला आवडत असो वा नसो, पण गर्दी खूप काही शिकवते माणसाला! स्टेशनला ब्रिजवर गर्दीत मधेच उभी किंव्हा खाली बसलेली म्हातारी, तिचे पाणावलेले डोळे, पसरलेले हात, केवीलवाणी नजर, सुरकुत्या पडलेलं कृष, अशक्त शरीर.... कसं जगायचं, कसं चालायचं, कसं वागायचं, कसं झेलायचं, कसं  बोलायचं हे शिकवतो  गजबजाट... समाजाला जिवंतपणा देण्याचा काम गर्दी देते. आवाजाने घेरलेल्या "आपल्याला" आयुष्यभर प्रत्येक क्षणी ती असावी आसपास असावी असं वाटतं. ह्या कोलाहलात सकाळ कधी होते कळतच नाही.. मधल्या काळात गर्दीची आठवण आणि आठवणींची गर्दी येउन झालेली असते...मग शांत असलेल्या वातावरणरुपी कॅन्वासात आवाजाचे रंग भरायला सुरुवात होते ….   जसं आपल्या मोकळ्या, काळ्या आकाशात आपल्या कल्पकतेच चांदणं चमकतं !!! :)

                                                                   - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - गुगल इमगेस pixcooler.com )

No comments:

Post a Comment