Wednesday, May 27, 2015

NOSTALGIA ...

बा … प … रे … अडीच महिन्यांपूर्वी जेव्हा ब्लॉगवर लिहायला सुरवात केलेली तेव्हा खरं म्हणजे डोक्यात चित्र clear होतं की आपल्याला काही रोजच; किंवा रोज कशाला, नियमित सुद्धा लिहायला नाहीच जमणार बहुदा ! अभियांत्रिकी करताना, आणि तेही शेवटच्या वर्षी, असले छंद जोपासायचे म्हणजे एकाच वेळी दोन नावांवर पाय ठेवण्यासारखं आहे … आणि नाही, ही काही अतिशयोक्ती नाही … पण जिथे कित्येकदा जेवायला सवड मिळायची नाही तिथे लिहिण्या-बिहीण्याचे चोचले कसे हो घ्यायचे पुरवून !!! तर सांगायचा मुद्दा असा की लिहिण्यात खंड पडणार हे गृहीत धरलेलंच होतं, पण तो खंड अक्षरशः आशिया खंडाएवढा मोठ्ठा असेल असा विचार नव्हता केला कधी. परीक्षा, assignments, परीक्षा, project, viva … साखळीच लागली जणू … आणि आता आज वेळ मिळतोय … ना, किंबहुना योग जुळतोय पुन्हा लिहिण्याचा …

असो … परीक्षा संपून, घरी परत येउन आता आठवडा लोटलाय जवळपास. काय वाटतंय नक्की सांगता नाही येणार … डिग्रीची चार वर्ष संपली, rather संपली सुद्धा ? असं वाटतं परवाच तर मी सामान बांधून मुंबईला निघाले होते engineer व्हायला … ICT मध्ये प्रवेश मिळाला, हॉस्टेल मिळायला सुद्धा फारशी अडचण आली नाही … सुरवातीला अवघड वाटत होतं सगळंच … पण मग कॉलेज, हॉस्टेल, मुंबई सगळ्याचीच सवय झाली हळूहळू. चार वर्षांत डोंगराएवढं शिकायला मिळालं आणि असंख्य माणसं जोडली गेली … अशा अगणिक आठवणी मनःपटलावर कोरल्या गेल्या ज्या या जन्मात तरी विसरणं निव्वळ अशक्य आहे. कॉलेजचे मोहोत्सव … पहिल्या वर्षी जवळ-जवळ सगळ्याच कार्यक्रमात केलेली गाढवासारखी मेहनत … प्रत्येक परीक्षेच्या बरोबर आदल्या दिवशी हॉस्टेलवर घातलेला धुमाकूळ आणि मग अर्थातच जागवाव्या लागलेल्या रात्री … प्रयोगशाळेत केलेली मज्जा … दिवाळीच्या सुट्टीत काढलेल्या सहली … मराठीचा वारसा जपणाऱ्या आमच्या 'मंथन' या सांस्कृतिक मंडळाचे कार्यक्रम … त्या ओघातच सादर केलेली नाटकं, गाणी … सणावाराला हॉस्टेल मध्ये रंगलेल्या त्या 'dj nights' … शेवटचं वर्ष म्हणून हॉस्टेल मधल्या मुलांबरोबर केलेला आणि अजिबातच न जमलेला तो नाच … आणि मग हळू हळू जवळ आलेला शेवट … सगळ्यांबरोबर केलेलं शेवटचं lecture, शेवटची परीक्षा, शेवटची पार्टी, शेवटचा सिनेमा, शेवटचं जेवण, हॉस्टेल मधला शेवटचा दिवस … निरोप-समारंभ … निघताना डोळ्यात उभं राहिलेलं पाणी … भेटण्या-बोलण्याची दिलेली वचनं … आणि काहीतरी मागे राहून गेल्यासारखी अखंड वाटणारी हुरहूर … 

साधारण दिवेलागणीच्या वेळेस मी एकटीच खिडकीशी बसलेली असते. अचानक वाऱ्याची एक मंद झुळूक हृदय स्पर्शून जाते. आणि या सगळ्या आठवणी एका पाठोपाठ एक मनावर कोसळू लागतात … कुठेशा वाचलेल्या ओळी आठवतात … 


मनाच्या गाभाऱ्यात 
आठवणी दाटतात 
पापण्यात साठतात 
स्मृतीची गवतफुले 
दुरूनच वेडावतात 
हर्षाचे दवबिंदू 
मोत्यापरी चमकतात 
ओंजळीत घेताना 
क्षणभरात निसटतात … 

आठवणींचे हे दवबिंदू माझ्या ओंजळीतून कधीच निसटू नयेत असं वाटत राहतं. हे मोती शब्दांच्या शिंपल्यात कायमचे जपण्यासाठी मन धडपडू लागतं. हात नकळत लेखणीकडे वळतात आणि कागदावर अविरत होत राहते, आठवणींची पानगळ ……

-निकिता 
   

No comments:

Post a Comment