Friday, March 13, 2015

नमस्काराचा उपचार !!!

नमस्कार मंडळी …….

आज-काल 'नमस्कार' वगैरे सारखे शब्द जरा कमीच कानी पडतात नाही का ! आता रुजलेली पद्धत म्हणजे 'hi guys ... how's life?' अर्थात मी पण बहुतेकदा अगदी हेच उद्गार काढलेले असतात कोणाला भेटल्यावर. पण ओसाड माळरानात चालता चालता अचानक पाण्याचा नितळ झरा नजरेस पडावा तसं कधीतरी कॉलेजची 'सांस्कृतिक मंडळी' भेटतात आणि 'नमस्कार'चं संबोधन कर्णसुख देऊन जातं. मग अवचित कधी तिथं त्या घोळक्यात जरा रेंगाळण होतं; अर्थात या engineering मधून जरा जरी वेळ मिळाला तर! मग सहाजिकच गप्पांना तोंड फुटतं. कोणी नुकताच पाहिलेल्या चित्रपटाबद्दल सांगता, कोणी आत्ताच वाचून संपवलेल्या पुस्तकाचं रेडीमेड विवेचन पुरवतं. कधी-कधी अगदी काहीच खास विषय नसतो पण तास दोन तास कधी गेले हे कोणालाच समजत नाही. अचानक कोणाचा तरी फोन वाजतो आणि सगळ्यांनाच आपल्या तुंबलेल्या कामाचं स्मरण होतं. आपण नेहमी भेटत राहायला हवं, अशा गप्पा कायम व्हायला हव्या अशी इच्छा सगळेच व्यक्त करतात; तसं वचनही देतात एकमेकांना. आपलं मराठीपण जरा जपल्याच्या समाधानात प्रत्येक जण असतो. पण त्यानंतर तसाच योग परत जुळून यायला चांगले तीन-चार महिने उलटून गेलेले असतात. 

दरम्यानच्या काळात मनात बरंच काही खलत असतं, अनेकदा विचारांचं वादळ मेंदूत थैमान घालतं. पण ते व्यक्त करायला एक तर वेळ नसतो नाही तर माणूस. आणि असे विचार जेव्हा आपण दाबून टाकायला लागतो न तेव्हा आपलं मन हळू हळू बोथट, असंवेदनशील होऊ लागतं. शरीराप्रमाणेच मग मनही आजारी होऊन जातं. 

या विचारानं मन अस्वस्थ झालं माझं. आणि यावर उपाय सापडला तो म्हणजे लिखाण. मला वाटतं समोरच्याला समजायला सोप्पं जाईल अशा रितीनं व्यक्त व्हायला लिखाणासारखं दुसरं साधन नाही. आणि त्याच्या उद्देश जर फक्त व्यक्त होण्यापलीकडे जाऊन माणूस जोडणं असा ठेवला तर त्यातून अतिशय सुंदर आणि उदात्त आविष्काराची निर्मिती होते. 

अशाच काही गप्पा, काही विचार घेऊन आम्ही तुमच्या भेटीला वेळोवेळी येत जाऊ. या व्यासपीठावर मी, निकिता आवारे, आणि माझे दोन सवंगडी अपूर्वा तायडे आणि विश्वजीत पाटील आपले विचार तुमच्याशी share करणार आहोत. आणि हो … अगदी काही अवघड, अवजड मराठी किंवा फक्त मराठीचाच अट्टाहास असा काहीही तुम्हाला आमच्या blog वर दिसणार नाही, कारण मनं जोडायला फक्त भावनाच पुरेशा असतात !!!

मात्र तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यात आळस मात्र करू नका हा … हा संवाद घडावा आणि उत्तरोत्र रंगत जावा हीच शारदाचरणी प्रार्थना …… 

2 comments: